Popular Posts

Monday, July 30, 2018

देवाबद्दल अंधश्रद्धा अजिबात ठेवू नका. पण देवावर श्रद्धा मात्र जरूर ठेवा.

एकदा स्वामी विवेकानंद यांना एका विद्वान (अतिहुशार) व्यक्तीने जेवणासाठी आमंत्रित केले.
जेवणाचा कार्यक्रम उरकल्यानंतर त्याने स्वामी  विवेकानंद यांना सहज
हसत हसत म्हणटले की,
     स्वामीजी बघाना काय मूर्ख लोक असतात, खुशाल दगडाचा देव बनवून त्याची पूजा करतात.
किती मूर्खपणा आहे.
मला तर देव या जगात अस्तित्वात असल्याचे वाटत नाही. सगळे थोतांड आहे.
       तेहतीस कोटी काa,aय या जगात एकही देव अस्तित्वात नाही.
 सगळा मूर्खपणा आहे. देव कुठे दगडाच्या मूर्तीमध्ये असतो का?
       आणि तो व्यक्ती खदखदा हसू लागला.
            हे सर्व स्वामी विवेकानंदांनी
शांतपणे ऐकून घेतले व त्या व्यक्तीला म्हणाले की,
 " तुमच्या पाठीमागे भितींवर लावलेला फोटो तुमच्या वडिलांचा आहे का? "
त्या व्यक्तिने होकारार्थी मान डोलावून म्हणटले "हो ते माझे वडील होते, दोन वर्षापूर्वी त्यांचा स्वर्गवास झाला आहे."
          स्वामीजी म्हणाले तुम्हांला कसे माहीत की तुमचे वडील स्वर्गातच गेले.
     तो व्यक्ती निरूत्तर झाला.
त्यानंतर स्वामी विवेकानंदांनी त्या व्यक्तीला तो फोटो समोर आणुन ठेवण्यास सांगितलं.
     त्याने त्याच्या वडिलांचा फोटो समोर आणुन ठेवला.
  स्वामी विवेकानंदानी त्याला सांगितले कि, आता एक काम करा, या फोटोवर थुंका.
       तो व्यक्ती विवेकानंदांकडे आश्चर्याने पाहून म्हणाला.
"काहीतरीच काय सांगताय स्वामीजी, मी माझ्या वडिलांवर कसा काय थुंकू शकतो."
          स्वामी विवेकानंद म्हणाले, " तो तर कागद आहे. ते थोडेच तुमचे वडील आहेत."
त्यावर तो व्यक्ति म्हणाला "मी या फोटोमध्येच माझ्या वडिलांना पाहतो.
त्यामुळे मी त्यांचा अपमान करू शकत नाही."
   यावर स्वामी विवेकानंद म्हणाले कि "जसे तुम्ही श्रद्धेने तुमच्या वडिलांना या फोटोमध्ये पाहता तसेच प्रत्येक व्यक्ती मूर्तीमध्ये परमेश्वर पाहत असतो. त्यामध्ये त्यांचा भक्तीभाव व श्रद्धा लपलेली असते.
  हे ऐकून तो व्यक्ती खुप खजील झाला व विवेकानंदांचे पाय पकडून माफी मागु लागला.

     परमेश्वर हा कणाकणांमध्ये सामावलेला आहे.
कोणाला तो मातेच्या चरणामध्ये दिसतो तर कोणाला दिनदुबळ्यांमध्ये दिसतो.

      संत तुकाराम महाराज म्हणतात.
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधु ओळखावा देव तेथेची जाणावा.
 
 देव जाणून घेण्यासाठी पॆसा नाही तर खरा भक्तिभाव लागतो.
    देवाबद्दल अंधश्रद्धा अजिबात ठेवू नका.
पण देवावर श्रद्धा मात्र जरूर ठेवा

Wednesday, July 25, 2018

मागील पिढी आणि आजची पिढी

नमस्कार, मी प्रजोत कुलकर्णी आज मी मागील पिढी आणि सध्याची पिढी यावर लेख लिहित आहे, बरेच दिवस हा लेख लिहायचा विचार होता पण वेळेअभावी जमले नाही असो पण लेख लिहायचे कारण म्हणजे सध्याची पिढी आणि मागील पिढी यामध्ये भरपूर तफावत जाणवत आहे. माझ्या २६ वर्षाच्या आयुष्यात बरेच बदल मला जाणवले. मी माझ्या आयुष्यावरून हा लेख लिहित आहे. पण ही तफावत जी आहे ती सर्वांच्याच बाबतीत दिसून येईल तसेच सर्वांच्या जुन्या आठवणी जाग्या होतील. मी लहानपणापासून सुरवात करत कसे बदल घडत गेले ते मांडायचा प्रयत्न करतो आणि मग सगळ्यात शेवटी एक सारांश लिहितो.मी लहान असताना सकाळ संध्याकाळ घरात माझ्याकडून श्लोक, स्तोत्रे म्हणून घेतली जात होती. उदा. सदा सर्वदा, शुभंकरोती इ. पण आजकाल आईवडील दोघेही नोकरी करतात ते सकाळी घरातून निघाले कि पुन्हा रात्री घरी परततात, त्यामुळे मुलांकडून हे म्हणून घ्यायला वेळच मिळत नाही. कोणी नातेवाईक घरी आले किंवा आपण एखाद्या नातेवाईकाकडे गेलो कि मला ते कविता, गाणी, नाच  वगैरे येतं का विचारायचे, त्यावेळी बडबडगीते म्हणत होतो, नाच रे मोर सारख्या गाण्यावर नाच करून दाखवत होतो, पण आता तीच परिस्थिती बदलली आहे. मुले गाणी म्हण किंवा नाच कर असे म्हणाल्यावर मुन्नी आणि शीला यासारख्या गाण्याशिवाय त्यांना काही आठवतच नाही, आणि आपण किती सुंदर नाच केला किंवा गाणे झाले म्हणून टाळ्या वाजवतो.थोडे मोठे झाल्यावर अंगणात किंवा मैदानात जे खेळ खेळायचो त्यातील काही खेळ जे परदेशातून भारतात आले ते आताची मुले कॉम्पुटर, लॅपटॉप, आयपॅड वर खेळतात. लपंडाव, सूरपारंब्या, तळ्यात-मळ्यात, लगोरी, गोट्या, विष अमृत हे खेळ तसेच मैदानी खेळाबरोबरच बैठे खेळ उदा. सापशिडी, ल्युडो, काचा कवड्या आणि बरेच बारीकसारीक खेळ हे आजच्या मुलांना माहित देखील नाहीत. तसेच या प्रकारच्या खेळातून व्यायामही चांगला होत असे आणि बुध्दी हि तल्लख होत होती. त्या काळी व्यायाम हा प्रकार वेगळाच होता जोर, उठाबाश्या, दोरीउड्या, सूर्यनमस्कार, धावणे असे व्यायाम आम्ही करत होतो आता व्यायाम म्हंटले कि डम्बेल्स घ्यायचे, मशीन वर धावायचे,  वजन उचलायचे म्हणजे झाले.
त्यावेळी आहार हा हि खूप पौष्टिक असत होते, आजकाल ची मुले फक्त जाहिरात बघून नुडल्स खा कुठे पास्ता खा, अजून बाकीचे फास्टफूड खा असे करतात, त्यावेळी नाश्ता केला तरी तो शरीराला चांगला असा असे उदा. पोहे, शिरा, उपमा आणि हे शक्यतो रोज नसायचे रोज सकाळी सकाळी गरमागरम भाकरी त्यावर मस्त तूप मीठ लावून खायचो. तसेच रोजचा आहार पण सकस असत होता. डावा उजवा सगळा रोजच्या रोज पानात असत असे उदा. चटण्या, कोशिंबीर, लोणचे इ. त्यामुळे शरीराला लागणारी जीवनसत्व व्यवस्थितरीत्या मिळत होती याचा परिणाम म्हणजे शरीराचीही वाढ खूप चांगली होत असे.
त्यावेळेची शिक्षणपध्दती पण वेगळी होती, रोज सकाळी प्रार्थना, मग तास सुरु होत असत, शाळा सुटताना परत शेवटी प्रार्थना, वंदे मातरम असायचे यातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती, मोठ्यालोकांचा आदर यासारख्या गोष्टी शिकायला मिळायच्या, यातील बऱ्याच गोष्टी सध्या लुप्त झाल्या आहेत. त्यावेळेचे शिक्षकही खूप काटेकोर होते, मला शिक्षकाने मारले ती तक्रार घेवून जर घरी गेलो तर घरात दोन रट्टे मिळायचे, मग का मारले हे विचारले जायचे. आजकाल मुलेच शिक्षकांना मारतात वर त्याचे पालक त्यांना काहीच बोलत नाहीत. मुलांवर अभ्यासाचा प्रचंड ताण टाकला जातो, त्यात पालकांचा दोष नाही आहे हि यंत्रणा चुकीच्या पध्दतीने काम करत आहे. जर या स्पर्धेच्या युगात मुलांना टिकायचे असेल तर हे सर्व करावे लागते, मुलांच्या दप्तराचे ओझे हे त्यांच्या वजनापेक्षा जास्त आहे. पण हे सर्व करताना त्यांचे बालपण कुठेतरी हरवले जात आहे हे कुणाच्या लक्षात येत नाही. पालकांना आपण घेतलेले कष्ट फक्त दिसतात पण जे बालपण आपण जगलो (कठीण प्रसंग नाही तर खेळणे बागडणे इ.) ते आजकाल च्या मुलांना जगायला मिळत कि नाही हे कोण पाहत नाही. आज शाळा सुरु झाली कि सकाळी क्लास नंतर शाळा, मग पुन्हा संध्याकाळी क्लास, ज्या दिवशी सुट्टी असेल तेव्हा सुट्टीचे क्लास वेगळे, काय चाललाय हे ?. बरं शाळेला सुट्टी पडेल तेव्हा ते क्लास वेगळे, वेगळी वेगळी शिबिरे यात मुलांना बालपण काय असते हेच कळत नाही, त्यांना बालपण म्हणजे एक शिक्षा वाटू लागली आहे. एवढे करून जेवढे व्यवहार ज्ञान त्यांना मिळाले पाहिजे ते मिळताच नाही आहे उदा. माझ्या आधीची पिढी अजूनही आकडेमोड करताना तोंडी करते आणि मी कागद पेन किंवा कॅल्क्युलेटर चा वापर करतो, पण हे हि तेवढेच खरे कि मी जितकी आकडेमोड तोंडी करू शकतो तेवढी आज काल ची मुले करू शकतील कि नाही ती शंका आहे. मला पहिला मोबाईल मी एम. एस.सी ला असताना घरच्यांनी दिला होता, आणि गाडी मी नोकरीला लागल्यावर घेतली पण आजकालच्या शाळेत जाणाऱ्या लहान लहान मुलांकडे महागडे मोबाईल, गाड्या दिसून येतात.
लिहायचे झाले तर बरेच काही लिहिण्या सारखे आहे पण जे मला ४ मुद्दे (वरील ४ भागात मांडलेले) महत्वाचे वाटतात त्यावर मी सारांश लिहित आहे.
  • संस्कार : मुलांना चांगल्या संस्काराची गरज खूप आहे, जर का लहानपणीच चांगले संस्कार मुलांवर झाले तर ते त्यांना भविष्यात हि उपयोगी पडतात. ८-१५ दिवस वर्षातून किंवा सहा महिन्यातून मुलांना संस्कार शिबिरात पाठवले म्हणजे त्यांच्यावर संस्कार होत नाहीत, ते रोजच्या जीवनात आचरणात आणावे लागतात. त्यामुळे आपल्या मुलांना योग्य संस्कार होत आहेत कि नाही याची काळजी प्रत्येक पालकाने घेणे जरुरीचे आहे.
  • खेळ/व्यायाम : खेळ आणि व्यायाम यामुळे आपले शरीर घडते ते जर का योग्य नियोजन करून मुलांना त्याचे फायदे सांगितले तर ते त्यांच्यासाठी उत्तम होते. प्रत्येक खेळातून काहीतरी शिकण्यासारखे आहे. तसेच जो व्यायाम केला जातो तो जन्मभर त्यांना उपयोगी पडेल याचा विचार केला गेला पाहिजे. यामुळे आपले जे पारंपारिक खेळ आहेत हेही जतन केले जातील आणि याचा उपयोग मुलांच्या आयुष्यात नक्की होईल.
  • आहार : जो आहार मुलांना (आपल्यालाही) मिळाला पाहिजे तो आजकाल मिळत नाही आहे त्यामुळे आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती कमी होत चालली आहे. जर का सकस आणि चौरस आहार  आपल्याला मिळाला तर आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते.
शिक्षण : जे आज शिक्षण दिले जात आहे त्यामुळे मुलांच्यावर मानसिक ताण वाढत आहे. त्याच्या वयाच्या मानाने ते ओझे त्यांना पेलणे अवघड जात आहे, याचाही कुठेतरी विचार झाला पाहिजे. त्यांच्या अभ्यासाचे योग्य ते नियोजन करता आले पाहिजे. त्यांना व्यवहार ज्ञान शिकवायचा प्रयत्न केला गेला पाहिजे. सोप्या शब्दात शिकविण्यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे. जे करून त्यांना ते अवघड जाणार नाही व लगेच समजेल.

Tuesday, July 24, 2018

एमपीएससी परीक्षेत यश मिळवण्यासाठी क्लास लावावाच का?





नमस्कार मित्रानो, मी प्रकाश पोळ. राज्यसेवा 2016 परीक्षेतून गटविकास अधिकारी या  पदासाठी माझी निवड झाली आहे. रिजल्ट लागल्यापासून मी अनेक विद्यार्थी मित्रांशी बोललो आहे. बहुतेक जणांचा एक महत्वाचा प्रश्न म्हणजे पोस्ट मिळण्यासाठी क्लास लावलाच पाहिजे का? क्लास लावल्याशिवाय पोस्ट मिळत नाही का? हा प्रश्न सर्वाना पडण्याचे कारण म्हणजे सध्या MPSC/UPSC क्षेत्रात क्लासेसचे प्रचंड मार्केटिंग चालू आहे. निवड झालेल्या प्रत्येक अधिकार्याचा फोटो कोणत्या ना कोणत्या क्लासच्या बॅनरवर असतो. काही क्लासेस वर्तमानपत्रातून भल्या मोठ्या जाहिराती देतात. त्यात निवड झालेल्या बहुतांशी अधिकाऱ्यांची नावे आणि फोटो छापलेले असतात. 
महाराष्ट्रभर वितरित होणाऱ्या वर्तमानपत्रात या जाहिराती बघून तयारी करणारे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना वाटते कि निवड झालेले सर्व अधिकारी कोणत्या ना कोणत्या क्लासला होते. परंतु वस्तुस्थिती तशी नसते. बहुतांशी अधिकारी हे बिगर क्लासवाले असतात. मग त्यांचे फोटो क्लासवाले का छापतात? तर त्याचं असं आहे, जेव्हा एखादा विद्यार्थी कोणत्याही क्लासच्या मदतीशिवाय MPSC/UPSC चा अभ्यास करत असतो तेव्हा तो पूर्व आणि मुख्य परीक्षा क्लासच्या मार्गदर्शनाशिवाय पास होतो. परंतु मुलाखतीसाठी त्याला मार्गदर्शनाची आवश्यकता भासते. मग क्लासवाले मुलाखतीसाठी मोफत मार्गदर्शन करतात. त्यांच्यासाठी mock interviews आयोजित केले जातात. त्याबदल्यात त्यांच्याकडून त्यांचा एक फोटो आणि डिटेल्स घेतल्या जातात. जेव्हा अंतिम निकाल लागतो तेव्हा ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे त्यांचे फोटो तर क्लासवाल्यांकडे असतात. ते छापले जातात. 
विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी मोफत मार्गदर्शन मिळालेले असते त्यामुळे ते या गोष्टीला objection घेत नाहीत. परंतु यामुळे लाखो विद्यार्थ्यांची दिशाभूल होते आणि त्यांचा असा समज होतो कि क्लास लावल्याशिवाय यश मिळत नाही. माझा अनुभव वेगळा आहे. क्लास लावला पाहिजे असं मला कधीच वाटलं नाही. परंतु आर्थिक परिस्थिती सक्षम असती तर कदाचित क्लास लावला असता. परंतु क्लासेसची अव्वाच्या सव्वा फी परवडणारी नव्हती. त्यामुळे self study वर भर दिला. राज्यसेवा पूर्व, मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर सर्वांप्रमाणे मीही एखाद्या क्लास चा मार्गदर्शन वर्ग join करायचे ठरवले. जेव्हा मुख्य परीक्षा संपते तेव्हा लगेच मुलाखतीचे मार्गदर्शन वर्ग सुरु होतात. राज्यसेवा 2016 ची मुख्य परीक्षा सप्टेंबर मध्ये संपली. एक महिन्याने STI मुख्य परीक्षा होती. मी आणि माझे दोन मित्र मुलाखत मार्गदर्शनासाठी एका क्लासमध्ये गेलो. माझा first key नुसार स्कोअर 350, आणि त्या दोन मित्रांचा 340, 373. आम्ही तिघेही मुलाखतीसाठी मार्गदर्शन पाहिजे म्हणून गेलो होतो. जातानाच एका मित्राने सांगितले कि 350 मार्क्स ला तुला तिथे मार्गदर्शन मिळणार नाही. मार्क्स वाढवून सांग. पण मला ते योग्य वाटले नाही. आम्ही तिघांनीही खरे स्कोअर सांगितले. तर त्या सरांचा रिस्पॉन्स वेगवेगळा होता.

  • 340 मार्क्स - तुमची निवड होणार नाही. तुम्ही मुलाखतीची तयारी करू नका.
  • 350 मार्क्स- तुम्हाला एखादी क्लास2 वगैरे मिळू शकते. तुमचा स्कोअर कमी आहे. सध्या तुम्ही STI मुख्य परीक्षेची तयारी करा.
  • 373 मार्क्स- तुमचा स्कोअर खूप चांगला आहे. तुम्हाला 100% Dy.SP मिळेल. तुम्ही उद्यापासून  जॉईन करा. 

अजून second answer key यायची होती. तरी निष्कर्ष कसा काय काढला. आणि 340 वाला पास होईल कि नापास हे आधीच कसे ठरवले. अजून लेखी पेपरचे 100 मार्क्स बाकी होते. त्यात कुणाची किती क्षमता आहे याचा निर्णय क्षमता तपासण्याआधीच कसा होऊ शकतो. मार्गदर्शन करायचे कि नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न होता, पण प्रयत्नच करू नका असे सांगून नाउमेद का करायचे? मला राज्यसेवाच करायची असताना STI करायचा सल्ला देणे योग्य आहे का? जिथे मला 350 मार्क्स ला क्लास 2 पोस्ट मिळू शकते असे त्यांना वाटत होते. माझी लेखी परीक्षेची आणि मुलाखतीची क्षमता आधीच कशी तपासली? मग प्रत्यक्षात काय झालं? मला लेखी पेपरला 61 आणि मुलाखतीत 70 मार्क्स मिळाले. Second answer key ने 350 वरून 354 स्कोर झाला. एकूण बेरीज 485 होऊन गट विकास अधिकारी हि क्लास 1 पोस्ट मिळाली. महत्वाची गोष्ट हि कि मार्क्स चांगले असतील तरच त्या विद्यार्थ्याबद्दल आत्मीयता आणि कमी असतील तर दुजाभाव का ? ज्यांनी मला त्यावेळी मुलाखतीसाठी मार्गदर्शन करायला आत्मीयता दाखवली नाही त्यांनी माझे फोटो मात्र छापले...आमचा विद्यार्थी म्हणून. काही क्लास चालकांनी प्रामाणिक मदत केली. त्यांचे ऋण मी कधीच विसरणार नाही. इथे कुणाचाच उल्लेख करत नाही. मला मार्गदर्शन करणारे आणि न करणारे सर्वांबद्दल मला खूप आदर आहे. यश मिळाले तरी मी जमिनीवर आहे. फक्त  भावी पिढीची दिशाभूल होऊ नये यासाठी हा प्रामाणिक प्रयत्न. यात कुणावरही टीका करण्याचा, कुणाच्या भावना दुखवण्याचा हेतू नाही. क्लास लावावा कि नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र मी क्लास लावला नव्हता हि पण वस्तुस्थिती आहे.

तुम्हाला हे वाचायला आवडेल...

निरागस प्रेम...

   "प्रेमाच नात हे रक्ताच्या नातापेक्षा मोठ असत" हे नेहमीच म्हटल्या जात. पण समाजामध्ये जगत असताना हे खरच वाक्य सत्यात उतरत का?...